पुणे : ‘घाबरू नका, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. महापुरासारख्या संकटाला धीराने तोंड देत तुम्ही पुन्हा आयुष्य सुरू करत आहात, हे खूप प्रेरणादायी आहे....’ हे शब्द आहेत अक्षरनंदन शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी पूरग्रस्त भागातील मुलांसाठी लिहिलेल्या पत्रांमधील.
(यातील काही पत्रांचे फोटो बातमीच्या शेवटी दिले आहेत.)
भीषण संकटातून सावरण्यासाठी मानसिक आधाराचीही तितकीच गरज असते, हे लक्षात घेऊन अक्षरनंदन शाळेतील दहावीच्या वर्गातील मुला-मुलींनी पूरग्रस्त भागातील मुलांना दिलासा देणारी ही पत्रे लिहिली आहेत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या जनजीवनाची माहिती माध्यमांमधून पुण्यातील शालेय विद्यार्थ्यांनी घेतली. अशा वेळी पूरग्रस्त भागातील मुले या संकटाला कशी तोंड देत असतील, या चिंतेने अक्षरनंदन शाळेतील मुलेही अस्वस्थ झाली होती. त्यांची ही अस्वस्थता, पूरग्रस्त भागातील आपल्यासारख्याच मुलांसाठी काही तरी करण्याची तळमळ त्यांच्या पत्रांतून व्यक्त झाली आहे. शाळेचे पालक, शिक्षक, विद्यार्थी यांनी पूरग्रस्तांसाठी आवश्यक वस्तूंची मदत पाठवली. त्याबरोबर ही पत्रेदेखील पाठवण्यात आली.
पुरामुळे त्या भागातील मुलांची शाळा बंद असल्याने सुटी मिळाल्याचा आनंद होत असेल, याचा बालसुलभ आनंदही यातून दिसतो. त्याच वेळी, त्यांची वह्या, पुस्तके भिजली असतील, आता ती मुले अभ्यास कसा करतील, याची काळजीही आहे आणि त्यांना धीर देण्याची गरज असल्याची जाणीवही या मुलांना आहे, हेदेखील या पत्रांतील मजकुरातून दिसून येते.
पूरग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना ही पत्रे मिळाली असतील, तेव्हा नक्कीच त्यांना खूप आधार वाटला असेल. दूर शहरांमध्ये राहणारी मुले आपला विचार करत आहेत, आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत, या विचाराने नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले असेल. पुन्हा शाळेत जाण्याच्या, अभ्यास करण्याच्या त्यांच्या इच्छेला या पत्रांमुळे नक्कीच पालवी फुटेल.
स्वत:वरचा जगावरचा विश्वास जेव्हा उडून जातो..
माउलीची कूस बनून शब्दच मला जवळ घेतात ...
लाजिरवाणे असे जिणे अपमानाचे जगत जातो..
प्राण चुंबुन घुसमटलेले शब्दसखेच धीर देतात...
अंधारून येतात दिशा..चार भिंती एक छप्पर..
काळोखात बुडून जाते..झाडे खातात मुकाट मार..
चिक चिक माती रप रप पाय..ठणकणारी जखम जशी..
असे होते मन आणि शब्दच होतात सहप्रवासी..